हा खेळ प्रामुख्याने पावसाळयात खेळला जातो. पाऊस पडत असला कि अंगणात इतर खेळ खेळता येत नाही तर पण थोडा पाऊस थांबला की हा खेळ खेळता येतो. जमीन ओलसरच असावी. यासाठी दोन किंवा कितीही मुले चालतात.एक लोखंडाची छोटीशी ६ ते ९ इंच लांबीची काडी(कांब) घ्यायची. बारीक गजाचा तुकडा, किंवा मोडक्या छत्रीची लहानशी काडीही चालेल. पण कडक हवी.या काडीस जमिनीत खुपसण्यासाठी निमुळते टोक हवे.
खेळ कसा खेळावा
एकावर राज्य द्यायचे व इतरांनी ती काडी ओल्या जमिनीत/चिखलात रुतवायची. अशी फेकायची की जमिनीत खोचली गेली पाहिजे. पडली तर डाव गेला. अशी काडी रुतवत फेकत लांब जायचे डाव जाईपर्यंत सर्व भिडूंनी लांब लांब न्यायचे व नंतर राज्य असलेल्या मुलाने तेथपासून मूळ ठिकाणापर्यंत लंगडी घालत यायचे. जास्त मुले असली की खूप लांब दमछाक होते म्हणून याला पिदवणी म्हणायचे. कांब जमिनीत खुपसायची म्हणून या खेळास खुपसणी असेही म्हणतात.एखाद्या खेळात दमवणे याला 'पिदवणे ' असे म्हणत असत.
No comments:
Post a Comment