Friday, February 22, 2019

लेझीम

क्रीडाप्रकार व साधन

क्रीडाप्रकार व साधन. व्यायाम व मनोरंजन अशा दोन्ही उद्दिष्टांनी लेझीम खेळली जाते. ‘लेझम’ या मूळ फारशी शब्दावरून लेझीम शब्द प्रचारात आला असावा. त्याचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे. मूळ अर्थ बाजूला राहून आता लेझिमीचा आकार व वजन यांत बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी सु. २१/२ हात लांब बांबू (वेळू) घेऊन त्याला २ हात लांब लोखंडी साखळी धनुष्यासारखी लावून ही लेझीम तयार करीत. बांबूचा लवचिकपणा कमी होऊ नये, म्हणून साखळी अडकविण्यासाठी बांबूला आकडे लावीत असत आणि व्यायाम करतानाच साखळी अकडवीत असत. धनुष्यासारख्या या बांबूचा मध्यभाग जाड करीत. व्यायामासाठी वापरावयाच्या जड लेझिमीची तार जाड आणि वजनदार असे. लेझिमीचे निरनिराळे हात करून ही मेहनत केली, म्हणजे हातात चांगली ताकद येत असे. हा खेळ खास महाराष्ट्रीय असून पेशवाईच्या पूर्वकाळापासून तो रुढ आहे. गुजरातमध्येही तो खेळला जातो.

लेझीम रचना

हल्लीची लेझीम सु. ३८ ते ४५ सेंमी. (१५ ते १८ इंच) लांब लाकडी दांड्याची असून, त्या दांड्याला दोन्ही टोकांना कोयंडे बसवून लोखंडी कड्यांची साखळी जोडलेली असते. साखळी धरता येण्यासाठी मध्यभागी हाताच्या चार बोटांत बसेल एवढी, १५ सेंमी. (६ इंच) लांबीची, सरळ सळईसारखी लोखंडी मूठ असते. साखळीतील लोखंडी कड्यांमध्ये, नादध्वनी निर्माण व्हावा म्हणून पत्र्याच्या दोन दोन-तीन तीन चकत्या बसवलेल्या असतात. लेझिमीचे वजन अदमासे ०.७८ ते ०.९० किग्रॅ. (१३/४ ते २ पौंड) असते. लेझिमीचा खेळ हा पौरुषयुक्त वीरनृत्याचाही प्रकार आहे. त्यात विविध प्रकारचे नर्तकांचे शारीर रचनाबंध आढळून येतात. नर्तकसमूहांनी लेझीम वाजवत गोलाकार फेर धरून नाचणे, वेगवेगळी उलटसुलट वर्तुळे रचीत पुन्हा गिरकी घेऊन पूर्वपदावर येणे, दोना-चारांच्या रांगा करून संचलन करणे इत्यादी. ह्या सर्व हालचालींमध्ये एक प्रकारची सहजता व डौल प्रत्ययास येतो. या समूहनृत्यांत नर्तकांच्या हालचाली व पदन्यास यांचे खूपच वैविध्य दिसून येते. उड्या मारणे, उकिडवे बसणे, वाकणे, पावले तालासुरात मागे पुढे करीत. लयबद्ध रीतीने मागेपुढे सरकणे इ. अनेक नृत्यमय हालचालींचा त्यात समावेश होतो. लेझीम तालासुरात वाजवण्याच्या क्रियेत नर्तकाचे दोन्ही हात गुंतलेले असल्याने, हातांच्या हालचाली नियंत्रित होतात. लेझीम नृत्याची प्रत्येक हालचाल लेझिमीच्या ठेक्याशी व नादलयीशी सुसंगत रीत्या केली जाते. लेझीम नृत्य हलगी, ढोल, झांजा, ताशा या वाद्यांच्या किंवा आधुनिक काळात बॅंडच्या साथीवर केले जाते. सर्व नर्तकांच्या हालचाली तालबद्ध व एकसमयावच्छेदेकरून होत असल्याने त्यात आकर्षकता निर्माण होते. ग्रामीण देवदेवतांच्या पालख्या, गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सार्वजनिक मिरवणुका, खेड्यातल्या जत्रा, उरूस यांच्यापुढे लेझीम खेळणारे ताफे पाहावयास मिळतात. एक व्यायामप्रकार म्हणून शालेय शारीरिक शिक्षणात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

लेझिमीचे बडोदा-लेझीम (किंवा हिंदी-लेझीम), घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌.-लेझीम असे तीन प्रमुख प्रकार आहेत. बडोदा-लेझीम हा सैनिकी द्वंद्वांचे पवित्रे, आक्रमण, बचाव इत्यादींच्या मूळ रूपांचे शिक्षण तालठेक्यावर सामान्यजनांना देण्याचा एक उत्तम प्रकार आहे. तर घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌. - लेझीम हे प्रकार अधिक तालबद्ध व सामूहिक प्रात्यक्षिकांसाठी सुयोग्य व दर्शनीय आहेत. ताल-ठेक्यासाठी, विविध रचना-आकृतींसाठी घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌.-लेझीम यांचे संमिश्र प्रकार करून उत्तम प्रात्यक्षिके सादर करता येतात. नवव्या एशियाडमध्ये (१९८२, दिल्ली) महाराष्ट्राने आपल्या प्रांताचे प्रतीक म्हणून ४०० खेळाडूंचे लेझिमीचे सर्वोत्तम प्रात्यक्षिक दिले होते.

सापशिडी

सापशिडीच्या खेळात काय होतं? शिडी हाताशी आली की आपण झप्पकन वर जातो आणि सापानं गिळलं की दाणकन खाली आदळतो ! 

 

 "१३व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या व फाश्याचा उपयोग करून एक खेळ तयार केला. ह्यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार व सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार.शिडीच्या सहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ 'सापशिडी' ह्या नावाने अद्यापिही लोकप्रिय आहे." 
 
‘‘सापशिडी हा खूप जुन्या काळातला भारतीय खेळ आहे. त्याकाळी या खेळाला ‘मोक्षपट’ असंही म्हटलं जायचं. सापशिडी तेव्हाच्या काळी मनोरंजनासाठी खेळली जायचीच, पण थोडा वेगळा दृष्टिकोनही या खेळात होता. ‘‘पूर्वीच्या काळी सापशिडीच्या पटाच्या बाहेर ही अशी खूप चित्रं काढलेली असायची. देव-देवता, देवदूत, प्राणी, माणसं, पानं-फुलं अशी चित्रं सापशिडीच्या आजूबाजूला असत.’’ 
पूर्वी सापशिडीचा वापर नैतिकतेचे धडे देण्यासाठीही होत असायचा. म्हणजे आयुष्य हा सापशिडीचा पट आहे, असं मानून हाव, क्रोध, मत्सर, अभिलाषा असे साप आणि सत्कर्म, सदाचार, परोपकार अशा शिडय़ा त्यात डिझाइन केलेल्या असत. चांगलं वागणाऱ्या माणसांना मोक्ष मिळतो आणि वाईट वागणाऱ्या माणसांना सापाच्या तोंडातून खाली येऊन पुनर्जन्म घ्यावा लागतो, अशी काहीशी त्याकाळच्या सापशिडीची शिकवण होती.’’
 ‘‘नंतरच्या काळात मात्र नैतिकतेचे धडे वगळून फक्त साप आणि शिडय़ा असलेले पट दुकानात मिळायला लागले. काही काही देशांमध्ये तर शाळेतल्या मुलांना अंक मोजणं आणि इंग्लिश शब्द शिकवण्यासाठीसुद्धा सापशिडीचा वापर केला जातो. सापशिडी खेळताना अनेकदा पटावर पुढे जाऊन पुन्हा मागे यावं लागतं, त्यामुळे ‘बॅक टू स्क्वेअर वन’ असा शब्दप्रयोगही सापशिडीमुळे रूढ झाला.

भोवरा

हा खेळ मूळचा भारतीयच आहे. भारतासहित चीन व जपानमध्येही तो खेळला जातो. तो शंक्वाकार असून त्यात लोखंडाचं एक निमुळतं टोक असतं, त्याला आरू असं म्हणतात. पूर्वी भोवरा लाकडाचा आणि मोठ्या आकाराचा असायचा. आता तो प्लॅस्टिक किंवा फायबरचाही असतो.
प्राचीन ग्रीक-रोमन काळातही भोवऱ्याचा उल्लेख सापडतो. यूरोपात चौदाव्या शतकानंतर भोवऱ्याचा वापर आढळतो. जीन व जपानमध्ये भोवरा फार पुरातन काळापासून लोकप्रिय आहे. भोवरा एका टोकाला गोलसर जाड आणि दुसऱ्या टोकाला निमुळता असतो. निमुळत्या टोकात लोखंडाची तार बसवितात. तिला ‘आर’ आणि डोक्यावरील बोंडाला ‘मोगरी’ म्हणतात. निमुळत्या भागावरून गुंडाळलेली दोरी घसरू नये म्हणून त्यावर काप किंवा खाचा असतात. मोगरीपासून कापापर्यंत भोवरे रंगवून आकर्षक करतात. निमुळत्या बाजूकडून दोरी गुंडाळल्यानंतर दोरीचे एक टोक हातात पक्के धरून झटका देऊन तो आरेवर पडेल अशा रीतीने दोरीला ओढ देत फेकला, म्हणजे भोवरा फिरू लागतो. या दोरील ‘जाळी’ आणि भोवऱ्याच्या फिरण्याला ‘नाद’ असे म्हणतात.
हा खेळ खेळण्याचे काही नियम नाहीत, पण तो खेळायला तुम्हाला भरपूर सरावाची आवश्यकता असते. तसंच हा खेळ काळजीपूर्वक खेळावा लागतो, कारण भोवरा फिरवताना हातातून सुटला तर तो लागून दुखापत होण्याचीही शक्यता असते. भोवरा कितीही जण मिळून खेळू शकतात. अगदी एकटयानेही तो खेळता येतो.
भोवरा खेळताना डाव्या हातात तो पकडून त्यावर उजव्या हाताने भोव-याला घट्ट दोरा गुंडाळायचा. दोरा निमुळत्या बाजूकडून गुंडाळत जायचं. दो-याचं एक टोक हलकेच भोव-याच्या डोक्यापर्यंत खेचून त्यावर अंगठा ठेवून, भोवरा उजव्या हातात अलगद पकडायचा. उजवा हात खांद्यापर्यंत वर नेऊन जोरात झटका देऊन भोवरा सोडायचा. भोवरा जमिनीवर पडून टुणकन एखादी उडी मारून गरगर फिरतो. सुरुवातीला वेगाने फिरणारा भोवरा थोडा वेळ फिरल्यानंतर मंदावतो. भोवरा खेळायला जास्त जागा लागत नाही. भोवरा हातावर घेऊन खेळण्याचीही पद्धत आहे. त्यात इजा होण्याचीही शक्यता असते, म्हणून आपल्याला जमेल तसा तो खेळावा. आपणच काढलेल्या वर्तुळात भोवरा टाकायचा. अट अशी की, त्या वर्तुळाच्या आतच तो फिरायला हवा. तो वर्तुळाबाहेर गेला की बाद झाला.
हा खेळ खेळण्याची आणखी एक पद्धत म्हणजे भोवरा फिरवताना, ज्याचा सर्वप्रथम फिरेल तो जिंकला आणि ज्याचा नंतर फिरेल तो हरला. हरलेल्या सवंगड्यानं आपला भोवरा एका गोल रिंगणात ठेवायचा. नंतर दुस-या भोव-यानं त्याला आस देत तो ठरवलेल्या हद्दीपर्यंत घेऊन जायचा. (आस म्हणजे भोवरा फिरवून तो हातात घ्यायचा, फिरत असतानाच तो खाली ठेवलेल्या भोव-याला मारायचा) भोवरा हद्दीच्या रेषेच्या पलीकडे गेला तर आस देणारा जिंकला, जर त्याला आस देता नाही आली तर ती संधी दुस-याला मिळते. या प्रकारे भोवरा खेळायला तुम्ही कुशल भोवरेबाजच असावे लागता.

सागरगोटे/गजगे

हा मुलींचा खेळ समजला जातो.

दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. या साठी सागरगोटे लागतात. हे एका झाडाला येतात. सागरगोटयाच्या झाडाला काटे असतात. म्हणून तयार बाजारातून आणावे. (नसल्यास वाळूतील सारख्या आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोरा एवढे दगड ही चालतील) कमीत कमी ५ गोटे हवेत. दोन्ही जणी समोरासमोर बसून हा खेळ खेळायचा (अधिक मुली असल्यास गोलाकार बसावे) एका हाताने पाची सागर गोटे जमिनीवर हळूच पसरवून टाकायचे शक्यतो एकमेकाला चिकटू नयेत चिकटल्यास दुस-या मुली कडून मुंगीला वाट मागावी हळूच सरकवून अलग करावे. एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागर गोटा उचलावा व उंच उडवलेला सागरगोटा झेलावा असे झेलत उचलत जावे. उचलतांना झेलतांना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला. नाहीतर पुन्हा खेळायचे पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई, तिस-याला तिरखई, चौखई असे. दुस-या वेळी एक सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे एकदम उचलायचे. तिरखईला ३ उचलायचे अशात-हेने पहिली फेरी संपते. दुस-या फेरीत 'उपली सुपली' करायची म्हणजे सर्व सागरगोटे दोन्ही हातांनी (ओंजळीने ) हळूच वर उडवायचे व सर्वच्या सर्व हाताची उपली ओंजळ करुन त्यात पकडायचे. यातही ३ प्रकार एकदा एकच हात उलटा करायचा उजवा डावा मग दोन्ही पाच खडे घेतले असल्यास प्रत्येकी पाच वेळा असे करायचे. तिस-या फेरीत 'चिमणी कोंबडयाची चोच' करायची म्हणजे दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुफुंन अडकवायची आणि फक्त दोन्ही हाताचे पहिले बोट सोडून त्या दोन बोटांनी खाली टाकलेले खडे एक एक करुन ओंजळीत टाकायचे. सर्व खडे टाकुन होईपर्यंत एकही गोटा खाली पडता कामा नये. चौथ्या फेरीत 'हंडी चढवायची’ म्हणजे पाच खंडयापैकी दोन दोन खडे जोडून जमिनीवर ठेवायचे व पाचवा खडा उंच फेकून, दोन खडयांची जोडी उचलायची व वरचा खडा झेलायचा नंतर परत एक खडा वर फेकून जमिनीवरची दुसरी जोडी उचलायची व पहिली जोडी जमिनीवर ठेवायची. असे लागोपाठ सतत ५० ते १०० वेळा (जेवढयाची हंडी ठरली असेल तेवढे) करायचे म्हणजे ती जिंकली. ऐरखई- दुरखई करतांना डाव गेला तर दुस-या भिडूला खेळू द्यायचे व पुन्हा आपला नंबर आला की पुढील डाव खेळायचा. सर्व फे-या जिच्या लवकर पु-या होतील ती जिंकली. एकदा सवय झाली की खडे ५-७-९ असे वाढवता ही येतात.

चोरचिठ्ठी

उन्हाळा म्हटलं की, आपल्याला घरी बसून बैठे खेळ खेळणं जास्त सोयीचं वाटतं. कारण उन्हात धावपळीचे खेळ खेळून आपण थकून जातो. अशा वेळी चोरचिठ्ठी हा खेळ खेळायला छान आहे. या खेळाची आणखी एक गंमत म्हणजे या खेळात कोणताही खेळाडू बाद होत नाही. या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलिस असे पाच जण असतात आणि प्रत्येकाला गुण असतात. म्हणजे राजाला पन्नास, राणीला चाळीस, प्रधानाला तीस, पोलिसांना वीस आणि चोराला दहा गुण. या खेळाची सुरुवात करताना वहीचं एक कोरं पान घ्यायचं. त्या पानाच्या पाच चिठ्ठय़ा करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलिस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचं आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठय़ा एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठीत जे नाव असेल ते कोणालाही सांगायचं नाही. ज्या मुलाच्या हाती ‘पोलिस’ असं लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचं. नंतर पोलिस असलेल्या खेळाडूने ‘चोर’ कोण आहे हे ओळखायचं.
चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशारे न करता गुपचूप बसून राहायचं. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखलं, तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला तर तो हरला. तो जिंकला तर त्याला चोर आणि स्वत:चे मिळून तीस गुण मिळतील आणि हरला तर शून्य आणि ते तीस गुण चोराला जातील. या खेळाच्या अशा अनेक फे-या चालतात. पहिली फेरी संपली की, एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात. मग पुन्हा चिठ्ठय़ा उडवून खेळ सुरू करायचा. हा खेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही खेळू शकता. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात, ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील तो ‘चोरचिठ्ठी’ खेळाचा विजेता बनतो आणि या खेळात चिठ्ठय़ा एकदाच बनवायच्या आणि त्या जपून वापरायच्या. अशाने वह्यांची पानं खराब होत नाहीत.

पिदवणी/खुपसणी

 हा खेळ प्रामुख्याने पावसाळयात खेळला जातो. पाऊस पडत असला कि अंगणात इतर खेळ खेळता येत नाही तर पण थोडा पाऊस थांबला की हा खेळ खेळता येतो. जमीन ओलसरच असावी. यासाठी दोन किंवा कितीही मुले चालतात.एक लोखंडाची छोटीशी ६ ते ९ इंच लांबीची काडी(कांब) घ्यायची. बारीक गजाचा तुकडा, किंवा मोडक्या छत्रीची लहानशी काडीही चालेल. पण कडक हवी.या काडीस जमिनीत खुपसण्यासाठी निमुळते टोक हवे.

खेळ कसा खेळावा

एकावर राज्य द्यायचे व इतरांनी ती काडी ओल्या जमिनीत/चिखलात रुतवायची. अशी फेकायची की जमिनीत खोचली गेली पाहिजे. पडली तर डाव गेला. अशी काडी रुतवत फेकत लांब जायचे डाव जाईपर्यंत सर्व भिडूंनी लांब लांब न्यायचे व नंतर राज्य असलेल्या मुलाने तेथपासून मूळ ठिकाणापर्यंत लंगडी घालत यायचे. जास्त मुले असली की खूप लांब दमछाक होते म्हणून याला पिदवणी म्हणायचे. कांब जमिनीत खुपसायची म्हणून या खेळास खुपसणी असेही म्हणतात.एखाद्या खेळात दमवणे याला 'पिदवणे ' असे म्हणत असत.

भातुकली

पूर्वीच्या काळी म्हणे संसार नावाची एक गोष्ट होती. असे कसे म्हणता ती आजही आहे. पण, त्या संसाराची गोष्ट काही औरच होती. हा संसार म्हणजे तुमच्या सारख्या चिमुकल्यांची एक भातुकली. ही भातुकली काय? असा प्रश्न आजच्या पिढीतील कित्येक मुलांना पडत असतो. भातुकली म्हणजे तुमच्या आजी- आजोबांच्या, आई-वडिलांच्या पिढीचे बालपण. मे महिन्याच्या सुट्टीत मांडलेली प्रत्येक घराच्या अंगणात मांडलेली ही भातुकली म्हणजे एकोप्याने मांडलेल्या संसाराचे प्रतीक होती.

लग्नात तयार होणारी नवरी तिच्या लग्नाचा घाट, घरात पाहुणे मंडळी आल्यानंतर केलेला चहा-पानाचा कार्यक्रम अशा वेगवेगळ्या सवयीचे ते प्रतीक होते. तांब्यांच्या आणि पितळेच्या हंडा व कळशी, चिनी माती किंवा प्लास्टिकचा कप-बशीचा सेट, छोटे-छोटे कुकरचे डबे, इवलेसे चमचे, झारे, डाव, छोटासा गॅस आणि सिलिंडर, छोटासा कुकर, छोटी-छोटी पातेली, छोटंसं जातं आणि उरलेली छोटी-छोटी रंगबिरंगी लाकडी भांडी. याशिवाय कोणाकडे फ्रीज तर कोणाकडे पत्र्याचे कपाट या सर्व गोष्टी तुमच्या खेळण्यात कधी आल्यात का? नाही ना?

याचे कारणही तसेच आहे, कारण या भातुकलीची जागा आता बार्बी गर्ल आणि रेसिंग कारने घेतली. मातीच्या भांडय़ापासूनची बनलेली खेळणी खेळण्यात जी मज्जा आहे, ती या रेसिंग कारमध्ये नाही.

विटी-दांडू

विटी-दांडू या खेळात विटी आणि दांडू या दोन गोष्टी असतात. हा खेळ वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो. ओलीसुकी (टॉस) करून राज्य कुणावर ते ठरवलं जातं. एखाद्या चपटय़ा खापरीला एका बाजूला थुंकी लावून ओलीसुकी केली जाते. जो ओलीसुकी जिकंतो तो पहिल्यांदा विटी उडवतो. या खेळासाठी मैदानात एक गल म्हणजे थोडा लांब खड्डा तयार करायचा. या गलवर विटी आडवी ठेवायची. गलमध्ये ठेवलेली ही विटी दांडूच्या सहाय्याने उडवायची. ही विटी उडवताना समोर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तिचा झेल पकडला तर तो खेळाडू बाद. विटीचा झेल घेता आला नाही, तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने विटीने गुण मिळवायचे.यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर उडवायची. विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणं हे या खेळातलं सगळ्यात मोठं कसब असतं. त्याला आबकदुबक असे म्हणतात. त्यानंतर दांडूच्या सहाय्याने विटी बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे दूर भिरकवायची. ती जिथे पडेल तिथे जाऊन पुन्हा ती दूर भिरकवायची. हे करताना विटी जमिनीवर पडली की, खेळाडू बाद होतो. हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने केलेल्या आबक, दुबकच्या प्रमाणात अंक मोजले जातात. हे झाले संघाचे गुण. आबकप्रमाणेही गुण मोजले जातात. विटी एकदाच मारली, तर हे अंतर दांडूने मोजलं जातं. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली म्हणजे आबक केलं असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजलं जातं आणि जर दुबक केलं असेल तर विटीने मोजायचं. साहजिकच आबकदुबक करण्याचं कौशल्य जास्त असेल गुण जास्त होतात. विटी-दांडूचा हा खेळ भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, नेपाळ, कम्बोडिया, इटली या देशांमध्येही खेळला जातो.

शिवाजी म्हणतो..

पळापळीचे, उडया मारण्याचे खेळ खेळून झाल्यावर खूप दमायला होतं. अशा वेळी जेव्हा पळापळीचे खेळ खेळायचा कंटाळा येतो, तेव्हा एखादा बैठा खेळ खेळावासा वाटतो. त्यातलाच एक मजेशीर खेळ म्हणजे ‘शिवाजी म्हणतो..’ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शिवाजी म्हणतो म्हणजे नक्की काय? आणि हा खेळ कसा काय होऊ शकतो? म्हणूनच आपण या जुन्या खेळाविषयी अधिक जाणून घेऊया..कोणताही खेळ खेळायचा म्हणजे त्यामध्ये आधी सुटावं लागतं. जो शेवटी राहणार त्याच्यावर राज्य हा नियम सगळ्याच खेळाप्रमाणे या खेळातही लागू होतो, पण या खेळात आणि इतर खेळातला मुख्य फरक असा की, इतर खेळात राज्य येणा-या एकटया खेळाडूला इतर खेळाडूंना पकडावं, शोधावं लागतं. मात्र या खेळात जो खेळाडू शेवटचा सुटणार त्याच्यावर नियमाप्रमाणे राज्य येतं. तो ‘शिवाजी’ बनतो आणि इतरांना आज्ञा करतो. तो जे सांगणार ते इतर खेळाडूंना ऐकावं लागतं. मग तो, ‘शिवाजी म्हणतो, हसा’, डोक्याला हात लावा’, ‘हसता हसता मधेच थांबा’, ‘डोळे बंद करा’ अशी फर्मानं सोडतो आणि इतर खेळाडू ती ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात. जो खेळाडू त्याच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा चुकेल तो त्या खेळातून बाद होतो. या प्रकारे सगळे बाद होईपर्यंत हा खेळ सुरू राहतो. सगळे बाद झाल्यावर दुसरा कोणीतरी खेळाडू शिवाजी बनतो आणि हा खेळ चालू राहतो. बैठा आणि गमतीशीर असलेला हा खेळ खेळायला खूप मजा येते.

कांदाफोडी

कांदाफोडी हा एक गमतीदार खेळ आहे. या खेळीची गंमत म्हणजे हा खेळ तुम्ही कितीही जणांत खेळू शकता. या खेळात तुम्हाला शक्य तितक्या उंच उडय़ा मारायच्या असतात. ज्याच्यावर राज्य आहे तो खाली पाय पसरून बसतो आणि बाकीचे खेळाडू त्याचा पाय ओलांडून जात असतात. या खेळाच्या दुस-या फेरीत राज्य असलेला एकावर एक पाय ठेवून बसतो. एकावर एक ठेवलेल्या पायाला ओलांडणारा खेळाडू त्याच्या पायाने स्पर्श करतो, त्यालाच कांदाफोडी असं म्हणतात. या प्रकारे खेळ सुरू झाल्यावर राज्य असलेला आपल्या लांब केलेल्या पायांवर एका हाताची करंगळी धरतो आणि हात सरळ ठेवतो. उर्वरित खेळाडू ते ओलांडून जातात. मग बसलेला खेळाडू एक करंगळीवर दुसरी करंगळी ठेवतो, त्यानंतर पुन्हा सगळे खेळाडू त्याला ओलांडतात.
दुसरी आणि तिसरी फेरी कोणीही सहज ओलांडून जातो. पण जेव्हा राज्य असलेला हात-पाय एकावर एक धरून तो मनोरा उंचावतो, तेव्हा खरी मजा येते. प्रत्येक वेळी तो जे करेल, त्यावरून प्रत्येकाने उडी मारायची असते. उडी मारताना मारणारा पडला किंवा त्याच्या हात किंवा पायाचा स्पर्श झाला तर तो बाद होतो. हाता-पायाच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्यावर राज्य असलेला हाताने पायाचे अंगठे पकडून ओणवा उभा राहतो. फक्त या वेळीच खेळाडूंनी त्याला उडी मारताना हात लावला तर चालतो. सरतेशेवटी राज्य असलेला उभाच राहतो, त्या वेळी त्याला ओलांडून जाणं हे कोणालाच शक्य नसतं, त्यामुळे या खेळात एकापाठोपाठ एक सगळेच बाद होतात व खेळ नव्याने सुरू होतो..

सूरपारंब्या

या खेळासाठी जरा मोठया झाडांची आवश्यकता आहे. कारण त्यावर चढून, उडया मारुन हा खेळ खेळायचा आहे. झाडाच्या फांद्या पक्क्या हव्यात. २/३ पासून कितीही मुले हा खेळ खेळू शकतात. अंगणात एक गोलाकार रेखून त्यामधे एक काडी/काठी ठेवायची. एकावर राज्य व इतरांपैकी एकाने पायाखालून वर्तुळातील काठी लांब फेकायची. राज्य असलेल्या मुलाने ती काठी आणून वर्तुळात ठेवायची. तेवढया वेळात इतर मुलांनी पटापट झाडावर चढून जायचे किंवा वडासारख्या झाडाच्या पारंब्याला लोंबकळून पाय जमिनीच्या वर घ्यायचे. कुणी खाली राहिल्यास त्याला राज्य घेतलेल्या मुलाने पकडायचे (आऊट करायचे), किंवा २ मुलानी   झाडावरुन उडी मारुन काठी पुन्हा पायखालुन फेकण्याचा प्रयत्न करायचा व राज्य असलेल्या मुलाने पटकन कुणाला तरी पकडायचे. जो आऊट होईल त्याच्यावर राज्य. पुन्हा सर्वांनी पळत जाऊन झाडावर चढायचे.

गोटय़ा

हा खेळ खेळण्याची एक मजा आहे. या खेळामुळे आपल्याला आपले लक्ष्य कसे निवडायचे ते कळते. गोटय़ा हा खेळ दोघांत किंवा अन्य बरोबर खेळता येतो. हा खेळ खेळण्यासाठी प्रथम एक रिंगण आखून घ्यायचे असते. त्यानंतर त्यात काचेच्या गोटय़ा टाकायच्या नंतर नेम धरून त्यावर निशाणा साधायचा असतो. जो जास्त गोटय़ा मारतो तो विजयी ठरवला जातो. या खेळाची निर्मिती ही मूळात मुलांनी एकाग्र व्हावे यासाठीच झालेली आहे. तेव्हा गोटय़ा हा साधा वाटणारा खेळ खूपच मजेदार आहे. बालमित्रांनो, तुम्ही खेळता की नाही, गोटय़ा? खेळत नसाल तर अवश्य खेळून पहा.

डब्बा ऐसपैस

लपंडावाचे आधुनिक रूप

लपंडावाचे आधुनिक रूप: (डबा ऐसपैस). आजच्या औद्योगिक काळात मोठ्या वाड्यांची शहरातील संख्या बरीच कमी होत आहे. त्याऐवजी सामूहिक गृहवसाहती निर्माण होत आहेत. अशा ठिकाणची लहान मुलेमुली एकत्र योतात. एक कुणीतरी मुलगा इतरांच्या पाठीवर बोटांच्या स्पर्शाने संख्या काढतो. ही संख्या ज्याने ओळखली, तो सुटला. पण जाला ही संख्या ओळखता येत नाही तो राजा होतो. त्याच्यावर राज्य येते. लपण्याच्या जागांचा साधारण मध्यभागी एक पत्र्याचा डबा ठेवण्यात येतो. जाच्यावर राज्य आहे त्याने डब्याजवळ उभे राहायचे. लपलेला प्रत्येकजण जाच्यावर राज्य आहे त्याला चुकवून डब्याला पायाने उडवून देण्याचा प्रयत्न करतो. अशा एखाद्याने धावत येऊन डब्याला उडवून देऊन ओरडायचे ‘डबाऐसपैस ?’ मग मात्र प्रत्यकाने राजाला न दिसता डब्यापर्यंत येण्यास हरकत नसते. राजाने डब्याच्या जवळ उभे राहून एकेकाचे नाव घेऊन तो कुठे लपला आहे हे सांगावे. असे एखाद्याचे नाव सर्वप्रथम सांगितले गेले, तर पुढील डावात त्याच्यावर राज्य येते आणी खेळ पुन्हा सुरू होतो.

लपंडाव

खेळासाठीचे ठिकाण

लहान मुलांचा सुलभ, मनोरंजनात्मक खेळ. या खेळात विशेष नियम, नियंत्रक, स्पर्धा वगैरे तांत्रिक बाबी फारशा नसतात. एखाद्या घरातील वा शेजारपाजारच्या घरांमधील परस्पर परिचित मुलेमुली वाड्यात, अंगणात वा मोकळ्याशा जागेत हा खेळ खेळतात.

खेळ कसा खेळावा

खेळाचा प्रारंभ राज्य कुणावर यानुसार ठरतो. कुणी राज्य घ्यायचे, हे ठरविण्यासाठी चकणे हा प्रकारकेला जातो. तीन मुले एकत्र होतात हात घालून उभी असतात. ‘एक,दोन, तीन’ किंवा ‘रामराई साई सुट्‌ट्यो’ म्हणतात व त्याचबरोबर प्रत्येकजण आपले हात एकमेकांवर पालथेटाकतात. ज्याचे तळवे एकमेकांवर आहेत हा एक प्रकार व ज्याचे तळवे एकमेकाकडे तोंड करून टाळी वाजविल्यासारखे आहेत हा दुसरा प्रकार, तिघापैकी ज्या एकट्या गड्याचा प्रकार वेगळा असेल तो सुटला. या सुटलेल्या गड्याने ‘मी सुटलो’, म्हणून सहज जरी छातीला हात लावले तरी ‘जळला’ मानतात. त्याने परत ‘उतरावे’ महणजेच चकण्यात भाग घ्यावा लागतो. जळण्याचा प्रकार टाळण्यासाठी दोन्ही हात पायांखालून काढण्याचा प्रघात आहे. जो सुटला आहे तो इतरांसाठी परत चकू शकतो.ज्याच्यावर राज्य आले, त्याला एका विशेष जागी उभे करतात; किंवा बसवतात. त्याच्या मागे उभे राहून एकजण त्याचे डोळे घट्ट झाकतो. एखादा खांब किंवा झाड वा राज्य आलेल्या खेळाडूचे डोळे झाकणारी व्यक्ती याला ‘भोज्या’ म्हणून ठरवितात. एव्हाना बाकीची मुले वा खेळगडी लपण्यास जातात. जो डोळे झकतो, त्यास गुजराती मध्ये ‘डाई’ म्हणतात. मुले लपल्यावर डाई सर्वाना  ऐकू जाईल अशा रीतीने ‘डाई मिठीचा घोडा पाणी पि...तो, साई सुट्यो’ असे म्हणतो व राज्य आलेल्या खेळाडूस डोळे उघडून लपलेल्या मुलांना शोधण्यास सोडतो. तो कोण कुठे लपलेय हे शोधून काढत असताना, लपलेल्या प्रत्येकाने त्याला शक्यतो न दिसता, त्याने आपणाला शिवण्यापूर्वीच भोज्याला शिवायचे असते. म्हणजे मग तो वाद होत नाही. पूर्वीची मोठी कुटुंबे, मोठे वाडे, एक तर अंधेरे असत. त्यात आजघर-माजघर, पडवी-ओसरी, ओसरीवर कुठे कणग्या, पोती, माळा, माळवदे अशा अनेक जागा लपण्यास असत. या खेळात राज्य आलेल्या खेळाडूने दोनतीन जणांना बाद केले ; म्हणजे शोधून काढले तर जे बाद झालेत त्यांची गुप्त नावे ठेवून ‘कुणी घ्या चंद्र, कुणी घ्या सूर्य, कुणी ध्रुव’ अशी त्यांची मागणी करतात.ज्या नावाबद्दल मागणी करण्यात येत नाही, त्याच्यावर राज्य येते व परत खेळ सुरू होतो.

लगो-या


लगो-या हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. पेशवाईतही तो खेळला जात असल्याचे उल्लेख सापडतात. या खेळात दोन संघ असतात. खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगो-या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळीत करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगो-या रचणा-या संघास बाद करणे. असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ विजयी होतो.या खेळात वापरल्या जाणा-या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. ही लगोरी पारंपरिक, विनासंयोजित खेळामध्ये फरशीच्या वा विटांच्या तुकड्यांची असे. मात्र आता बाजारात, एकापेक्षा एक होत लहान जाणा-या देवळाच्या शिखराप्रमाणे किंवा शंकूच्या आकारासारखा निमुळत्या होत गेलेल्या सात वर्तुळाकार, रंगीत, गोल आकारांचा लगोरी संच मिळतो. त्या फोडण्यासाठी टेनिसचा चेंडू वापरतात.लगो-या व चेंडू एवढेच साहित्य, साधे-सोपे नियम आणि छोटे मैदान यामुळे हा खेळ बालकांना खेळण्यास सुलभ व प्रिय ठरतो.

६ ते १३ वयोगटाच्या मुलामुलींसाठी हा खेळ साधारणपणे योग्य आहे. या खेळासाठी १८.२८ मी. ते ३०.४८ मी (६० ते १०० फूट) व्यासाचे एक वर्तुळ आखून घेतात. त्याची परीघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात. या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लावताना लगोरी ही येथे रचावी लागते. सात वा अकरा खेळाडूंचे असे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक-एक खेळाडू लगोरी फोडण्यास येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडणारा लागोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मागे उभा असतो. इतर १० क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणा-या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.लगोरी फोडणारा लगोरी फोडताना बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याला जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लागोरीमागील किंवा शेजारील खेळाडूने वरचेवर झेलला, तर तो बाद होतो. लगोरी फोडणारा लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणा-या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगो-या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकाचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणा-यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी त्या संघास एक गुण मिळतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगो-या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.

आंधळी कोशिंबीर

एका खेळाडूने डोळे बांधून इतरांना शिवण्याचा लपंडावासारखा खेळ. वि. का. राजवाडे यांच्या मते कौशाम्बी नगरीतील ‘अंधाकौशिंबी’ या प्राचीन खेळावरून हे नाव आले. हा खेळ घरात वा बाहेर, मर्यादित चौरस वा गोलाकार बागेत खेळतात. खेळाडूंची संख्या नियमित नसते. डोळे बांधलेल्या खेळाडूची दिशाभूल करण्यासाठी प्रथम त्यास गरागरा फिरवितात. नंतर त्याने इतरांपैकी कोणासही शिवणे, चाचपून ओळखणे किंवा आवाजावरून ओळखणे, असे या खेळाचे काही प्रकारभेद आहेत. यांपैकी कोणत्याही प्रकाराने शिवलेला वा ओळखलेला खेळाडू बाद होतो; त्याच्यावर राज्य येते व खेळ पुन्हा चालतो. ‘लंगडी (आंधळी) कोशिंबीर’ या प्रकारात आंधळ्याखेरीज बाकीचे लंगडीने वावरतात. भारताप्रमाणेच चीन, जपान, कोरिया तसेच पाश्चात्त्य देशांतही वेगवेगळ्या नामरूपांनी हा खेळ रूढ आहे. एक प्रासंगिक खेळ म्हणून प्रौढही तो खेळतात.

राज्य घेणा-याला काही दिसत नसल्यामुळे हा खेळ खेळताना जास्त पळापळ होत नाही. त्याला चकवण्यासाठी इतर खेळाडू टाळ्या वाजवल्या जातात, वेगवेगळे आवाज काढतात, तर कधी हाकाही मारतात. सगळ्यांचा एकत्र आवाज आल्यामुळे तो खेळाडू गोंधळतो. एखाद हुशार असलेला खेळाडू त्याच आधारे दुस-या खेळाडूला बाद करतो.
‘लंगडी आंधळी कोशिंबीर’ हा या खेळाचाच एक उपप्रकार. यात राज्य असलेला खेळाडू सोडून इतर सगळे लंगडी घालत पळतात. हा खेळ भारतातच नाही तर चीन, जपान, कोरियासारख्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी खेळला जातो.

प्रस्तावना

 आंधळी कोशिंबीर, डोंगर का पाणी, हतुतु, डबा ऐसपैस, आटय़ापाटय़ा, भोवरा, साखळी साखळी, लपाछपी, विषामृत, काठय़ांचा खेळ.. ही नावं तुम्ही कधी ऐकली आहेत का? नसतील तर ती कसली आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगतो. ही आहेत काही खेळांची नावं! कदाचित तुमच्या दादा-ताईला ती ठाऊक असतील, नाही तर आई-बाबांना तर नक्कीच त्यांची माहिती असेल. या खेळांची नुसती नावं ऐकली तरी ते या खेळांच्या आठवणीत रमून जातील. कारण पूर्वी टीव्ही फारसे नव्हते आणि मोबाइल फोन तर अजिबातच नव्हते, त्या काळातल्या मुलांचे हे आवडते खेळ होते. विशेष म्हणजे, यातले बहुतेक खेळ मैदानी होते आणि त्यांना फारशी साधनंही लागायची नाहीत. सवंगडी जमले की, झाली खेळाला सुरुवात. आजच्या टेक्नोसॅव्ही काळातल्या तुम्हा मुलांना यात काय विशेष, असंच वाटेल, पण त्यात एक गंमत असायची. तुम्हाला या खेळांची माहिती नसल्याने ती गंमतही तुम्ही अनुभवली नसणार. म्हणूनच ती तुम्हाला अनुभवता यावी यासाठी आम्ही यातल्या काही खेळांची माहिती देणार आहोत. हे खेळ तुम्ही खेळलात तर तुम्हाला कळेल की, इंटरनेटवरच्या खेळांपेक्षा या अस्सल आपल्या मातीतल्या खेळांमध्ये किती धम्माल असते ती. हो, पण त्यासाठी थोडं मैदानाकडे फिरकायला हवं.. कमीत कमी तुमच्या सोसायटीच्या आवारात तरी.